नाशिक। दि. २४ जुलै २०२६: नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरण ९७ टक्के भरले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील दर शनिवारी लागू असलेली पाणीकपात महापालिकेने रद्द केली आहे.
शहराला गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी सुमारे ८० टक्के पाणीपुरवठा गंगापूर धरणातून होतो. यंदा ‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार धरणांतील मर्यादित साठा आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिकेने १७ जून २०२६ पासून प्रत्येक शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. गुरुवारअखेर धरणातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचल्याने धरणातून विसर्गही सुरू करण्यात आला आहे.
पाणीसाठ्यात झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेऊन महापालिकेने शनिवारची पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
![]()


