नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): उत्तर भारतात सलग पश्चिमी चक्रवात येत असल्याने काश्मीर, लेह, लडाख परिसरात हिमवृष्टी होत आहे. तिकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीमध्ये वाढ झाली.
किमान तापमानही सरासरी १ ते २ अंशांपर्यंत घटले. बुधवारी राज्यातील अनेक भागात सकाळी दाट धुके होते. मात्र, ८ डिसेंबरपासून ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळणार असून गुलाबी थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला.
विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत ७ डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज होता. तेथेही ८ डिसेंबरपासून वातावरण निवळेल व थंडीला सुरुवात होईल.
बुधवारी राज्यात सकाळपासून बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून किमान तापमानात काही ठिकाणी वाढ, तर कुठे घट झाली. परंतु थंड वाऱ्यांमुळे दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता.
पुढील ४ महिने ‘सुपर एल-निनो’ होणार सक्रिय:
भारतीय किनारपट्टीवर तयार झालेले मिचाँग चक्रीवादळ समुद्रातून जमिनीवर आल्याने त्याची तीव्रता घटली आहे. यामुळे बुधवारी दिवसभर मराठवाड्यासह विदर्भात ढगाळ वातावरण होते. उत्तरेकडून येणारे थंड वारे अडकून पडल्याने दिवसभर तापमान स्थिर होते. यामुळे दिवसभर गारठा जाणवला, तर रात्री यात घट झाली. गुरुवारी सूर्यदर्शन होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला.
मिचाँगचा प्रभाव संपुष्टात आल्यानंतर पुढील ४ महिने सुपर एल-निनोमुळे यंदा हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळाही सामान्य राहणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे रूपांतर मिचाँग चक्रीवादळात झाले. बुधवारी ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकून पश्चिम बंगालच्या दिशेने सरकले. त्यामुळे संभाजीनगरमध्ये मंगळवारच्या तुलनेत बुधवारचे किमान तापमान वाढले, तर कमाल घटले होते.