
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील वनारवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात २० वर्षीय पायल राजेंद्र चव्हाण या युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वनारवाडीत गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना घडल्याने तालुक्यात भीती आणि हळहळ पसरली आहे.
घटनेची माहिती अशी की, चव्हाण कुटुंब शेतात गवत कापण्याचे काम करत होते. यावेळी पायल ऊसाच्या बाजूने गवत कापत असताना अचानक मागून आलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. बिबट्याने पायलच्या मानेवर झडप घातली आणि तिला सुमारे ६ ते ७ फूट फरफटत नेले.
पायलच्या शेजारी असलेल्या बहिणीने आरडाओरड करताच परिसरातील शेतकरी, वडील, चुलते व इतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. गोंधळ आणि आवाजामुळे बिबट्याने पायलला सोडून पळ काढला.
तत्काळ पायलला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तिथे उपचार नाकारल्याने तिला दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांनी तपासणी करून पायलला मृत घोषित केले.
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.