नाशिक। दि. २६ जुलै २०२६: राज्यातील विविध भागांत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा वेग शनिवारी काहीसा कमी झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नाशिकसह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुढील पाच दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असून, विदर्भात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीचा आणि राजस्थान परिसरातील वातावरणीय स्थितीचा परिणाम महाराष्ट्रावर होत असून, त्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवाह सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी रायगड, रत्नागिरी आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर पुणे जिल्ह्यातील घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारसह खान्देश, तसेच सांगली-सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील १० जिल्हे आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये २७ ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या कालावधीत बहुतांश ठिकाणी कोरडे वातावरण किंवा अधूनमधून हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, विदर्भातील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
गेल्या चार दिवसांतील पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, एकूण साठा सुमारे ५६ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेषतः पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील धरणक्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसाचा त्याला मोठा फायदा झाला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरातील उंचावरील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पूर्व उत्तर प्रदेशाच्या दिशेने सरकत असल्याने अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीकडे येणाऱ्या मान्सून वाऱ्यांची तीव्रता काहीशी कमी होणार आहे. परिणामी, पुढील पाच दिवस राज्याच्या बहुतांश भागांत मुसळधार पावसाऐवजी हलक्या सरी किंवा कोरडे हवामान अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
![]()


