नाशिक। दि. ८ जुलै २०२६: भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. तसेच गुजरातच्या दक्षिण भागात अतिवृष्टी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, बागलाण, कळवण या सहा तालुक्यांत शाळा बंद ठेवण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली आहे.
श्री. राजपूत यांनी म्हटले आहे की, हवामान विभागाने दिलेला इशारा आणि गुजरातच्या दक्षिण भागात सुरू असलेल्या पावसाचा जिल्ह्याच्या उत्तर भागात होणारा प्रभाव या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या सूचना आणि अभिप्राय लक्षात घेऊन वरील निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. तसेच पावसाचा इशारा मिळाला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांसह सर्व धबधबे रविवारपर्यंत (१२ जुलै) बंद ठेवण्यात आले आहेत. तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यटनस्थळी जाऊ नये. तसेच धार्मिक ठिकाणांवर गर्दी करू नये. आठवडे बाजाराबाबत स्थानिक प्राधिकरणाने निर्णय घ्यावा, असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांनी म्हटले आहे.
सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे. पर्यटन स्थळ, धबधबे, धार्मिक ठिकाणांवर गर्दी करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
![]()


