
दीपक श्रीवास्तव यांजकडून…
निफाड। दि. ८ जुलै २०२६: नांदूरमध्यमेश्वर धरणातून अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने मध्यमेश्वर मंदिराजवळील बेटावर मासेमारीसाठी गेलेले सुमारे २० ते २५ तरुण पुराच्या पाण्यात अडकून पडल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक ८ जुलै रोजी घडली. सुमारे चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी कांतिलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने धरणाच्या डाव्या बाजूचे गेट बंद करून पाण्याचा प्रवाह कमी करण्याची व्यवस्था केली आणि सर्व तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी गावातील आदिवासी बांधव व तरुण मासेमारीसाठी मध्यमेश्वर मंदिर परिसरातील बेटावर गेले होते. या परिसराला दोन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा असून काही आदिवासी कुटुंबे तेथे वास्तव्यासही आहेत. दुपारी सुमारे ३ वाजता नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या उजव्या व डाव्या बाजूच्या गेटमधून सुमारे ५५,८४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीपात्रातील पाणी झपाट्याने वाढले आणि बेट चारही बाजूंनी पाण्याने वेढले गेले.
परिणामी १३ ते २५ वयोगटातील सुमारे २५ तरुण बेटावर अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली. राष्ट्रवादीचे नेते हरिश्चंद्र भवर यांनी तातडीने नामदार छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून धरणाचे गेट बंद करण्याबाबत सूचना केल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, माहिती मिळताच निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी कांतिलाल पाटील, पोलिस उपनिरीक्षक सोनल पडोळ, पोलिस कर्मचारी विनोद जाधव, नितीन सांगळे, धनंजय बैरागी, अरविंद ढवळे, सुनील सानप, राजू दरोडे, तसेच पोलिस पाटील गोरक्षनाथ डांगळे आणि ग्राम महसूल अधिकारी श्रीकांत मोंढे घटनास्थळी दाखल झाले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धरणाच्या डाव्या बाजूचे गेट बंद करण्यात आले. पाण्याचा प्रवाह काहीसा कमी होताच पोलिसांनी जीव धोक्यात घालून बेटावर अडकलेल्या शुभम माळी, समाधान माळी, रोशन माळी, मंगेश गायकवाड, अंकुश पिंपळे, लखन बर्डे, अजय पवार, दीपक पवार, रविंद्र बर्डे, शुभम बर्डे, खंडू बर्डे, नवनाथ आंबेकर, सुनील आंबेकर, महेश मोरे, महेंद्र पवार, अजय सोनवणे, सागर पवार, समाधान जिरे, यश पवार, भूषण पवार, अजय पवार यांच्यासह अन्य काही तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली. सकाळी ६ वाजता मासेमारीसाठी गेलेल्या तरुणांची सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुखरूप सुटका झाल्याने त्यांच्या नातेवाईकांसह पोलिस प्रशासनानेही सुटकेचा निश्वास टाकला.
![]()


