नाशिक। दि. १६ जुलै २०२६ : इगतपुरी तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या भावली धरण परिसरात पर्यटक कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नऊ संशयितांना इगतपुरी न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील सर्व संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर इगतपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बळप यांनी संशयितांची इगतपुरी शहर आणि भावली येथील घटनास्थळी धिंड काढली. यावेळी त्यांच्याकडून “नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला” अशा घोषणा देण्यात आल्या. या कारवाईमुळे समाजात कायद्याबाबतचा धाक निर्माण होण्यासह अशा प्रवृत्तींना आळा बसावा, हा उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील एक कुटुंब रविवारी भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेले असताना किरकोळ वादातून काही जणांनी त्यांच्या वाहनाची तोडफोड करत कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेप्रकरणी सुरुवातीला अंबड पोलिस ठाण्यात, त्यानंतर इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत नऊ संशयितांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित कैलास भागडे, आकाश भोईर आणि तुषार कडू यांच्यासह अन्य काही आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
![]()


