नाशिक। दि. २३ जुलै २०२६: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मनमाडमार्गे विशेष एकेरी रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांची प्रत्येकी एकच फेरी होणार असून, प्रवाशांसाठी ऑनलाइन तसेच आरक्षण केंद्रांवरून बुकिंगची सुविधा गुरुवार (दि. २३) पासून उपलब्ध करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मिरज–नागपूर विशेष गाडी २६ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरज येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, अहिल्यानगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा आणि अजनी या स्थानकांवरून धावणार आहे.
याशिवाय मिरज–नवी अमरावती विशेष गाडी २६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता नवी अमरावती येथे पोहोचणार आहे.
तसेच, पंढरपूर–भुसावळ विशेष गाडी २७ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळला पोहोचेल. या गाडीला कुर्डुवाडी, अहिल्यानगर, मनमाड आणि जळगाव येथे थांबे देण्यात आले आहेत.
या विशेष रेल्वेगाड्यांसाठीचे आगाऊ आरक्षण दि. २३ जुलैपासून रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकाची माहिती तपासूनच आरक्षण करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
![]()


