गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

नाशिक। दि. २५ जुलै २०२६: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणाचा जलसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातील वाढता साठा लक्षात घेऊन प्रशासनाने १९ हजार क्युसेक (५,३८,०२३ लिटर प्रति सेकंद) वेगाने जायकवाडी धरणाच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला आहे.

या विसर्गामुळे अवघ्या तीन दिवसांत सुमारे २५५ अब्ज लिटर (२५४ अब्ज ८४ कोटी लिटर) म्हणजेच जवळपास ९ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पोहोचल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर धरण ९७ टक्के भरले; शहरातील शनिवारची पाणीकपात रद्द

मुसळधार पाऊस आणि धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला २०१९ नंतरचा सर्वात मोठा पूर आला आहे. याचा फटका चांदोरी, सायखेडा यांसह एकूण ८ गावांना बसला असून, अनेक भाग गेल्या २४ तासांहून अधिक काळ पाण्याखाली आहेत. काही गावांचा ४८ तासांपासून संपर्क तुटला असून, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे २५० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला मुसळधार पावसाचा तडाखा; गोदावरीला हंगामातील पहिला मोठा पूर, जनजीवन विस्कळीत

गोदावरी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत विस्तारल्याने सायखेडा पूल ३० तासांहून अधिक काळ वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला.

रेल्वे वाहतुकीलाही फटका:
पुराच्या पाण्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. शुक्रवारी चार गाड्या रद्द करण्यात आल्यानंतर, शनिवार (२५ जुलै) रोजी आणखी तीन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

रद्द करण्यात आलेल्या गाड्या:
२०९२६ अमरावती – सूरत
०९०५१ दादर – भुसावळ
०९०५२ भुसावळ – दादर

प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पूरस्थिती लक्षात घेता आवश्यक त्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790