नाशिक। दि. १६ जुलै २०२६: आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागांत बुधवारी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, नाशिक शहरात दिवसभर ढगाळ वातावरण असूनही पावसाने हुलकावणी दिली.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील अनेक भागांत उष्ण व कोरड्या हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत होता. बुधवारी मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने अनेक ठिकाणी पावसाची सुरुवात झाली असून, हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र:
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. पुढील दोन दिवसांत हे कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन उत्तर-पश्चिम दिशेने जमिनीच्या भागाकडे सरकण्याची शक्यता आहे.
या प्रणालीमुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त पूर्वेकडील वाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, त्याचा परिणाम म्हणून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
![]()


