नाशिक जिल्ह्यात १५ तालुक्यांतील १३६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

नाशिक। दि. २ जून २०२६: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागात कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रशासनाने सर्वंकष नियोजन केले असून प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत पाणी पोहोचविण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री प्रसाद बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, अतिरिक्त धान्य पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कोयत्याने हल्ला, तोडफोड करणाऱ्या बेहनवाल टोळीचा केला ''कायद्याचा बालेकिल्ला'' !

जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की, जिल्ह्यात सध्या १५ तालुक्यांतील १३६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तुलनेत मागील वर्षी १ जून रोजी १४८ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता., मागील वर्षी टँकर सुरू असलेल्या ३३ गावांमध्ये यंदा टँकरची आवश्यकता भासलेली नाही. या गावांमध्ये राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करून त्याची परिणामकारकता तपासण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

पशुधनाची संख्या लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर टँकर उपलब्ध करून देण्यात आले असून गोठ्यांच्या संख्येनुसार पाणीसाठा टाक्या आणि पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.

पाणीगळती अथवा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, ग्रामपंचायती आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790