नाशिक (प्रतिनिधी): नवरात्रोत्सवानिमित्त राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक सप्तशृंगीगडावर दर्शनासाठी गर्दी करतात. त्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातून सुमारे ३०० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. घटस्थापना ते दसरा आणि दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत या गाड्या धावतील.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या वणी गडावरील सप्तशृंगीदेवीचे दर्शन घेण्यासाठी यंदा विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना खासगी वाहने गडाच्या पायथ्याशी लावून एसटीनेच गडावर जावे लागेल. नाशिक, मालेगाव, मनमाड, सटाणा, इगतपुरी आणि नांदुरी याठिकाणाहून वाहने धावतील.
सप्तशृंगीगडासाठी प्रवासी वाहतूक सेवा सुधारित भाडे आकारणीसह २४ तास असणार आहे. यासाठी ठक्कर बाजार, नांदुरी पायथा वाहनतळ, सप्तशृंगी गड वाहनतळ या ठिकाणी वाहतूक केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासोबतच नाशिक ते सप्तशृंगीगड या मार्गावर ई- बसच्या ३० फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. पहाटे ५ ते रात्री साडे ७ या कालावधीत फेऱ्या होतील.
![]()


