आजपासून बारावीची परीक्षा; विद्यार्थ्यांनी तणाव न घेता आत्मविश्वासाने सामोरे जावे !

नाशिक। दि. १० फेब्रुवारी २०२६: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आज मंगळवार (दि. १०) पासून सुरुवात झाली आहे. राज्यभरातील १० हजार ६६४ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून एकूण १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये २७१ भरारी पथकांची नियुक्ती, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा तसेच ड्रोनद्वारे देखरेख यांचा समावेश आहे. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

राज्य मंडळाने अधिकृतरीत्या प्रसिद्ध व छापील वेळापत्रकच ग्राह्य धरावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या किमान अर्धा तास आधी केंद्रावर उपस्थित राहावे. निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांची अतिरिक्त मुदत दिली जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही तणाव न घेता शांत मनाने आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

नाशिक जिल्ह्यात ८२ हजारांहून अधिक विद्यार्थी

नाशिक जिल्ह्यात यंदा एकूण ८२ हजार ३३८ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसत आहेत. यामध्ये ३८ हजार २०९ विद्यार्थिनी आणि ४४ हजार १२९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १२९ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून विज्ञान शाखेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४४ हजार २२५ इतकी आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790