नाशिक: नद्या या भारतीय संस्कृतीच्या साक्षीदार- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नाशिक। दि. ७ मे २०२६: नद्या या केवळ जलधारा नाहीत. त्या भारतीय संस्कृतीच्या साक्षीदार आहेत. आपल्या परंपरा, संस्कार, सण-उत्सव आणि सामाजिक जीवन हे नद्यांशी घट्ट जोडलेले आहे. त्यामुळे नदी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून “एक भारत, श्रेष्ठ भारत” ही संकल्पना अधिक दृढ करू या, असे आवाहन देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे बुधवारी आयोजित गोदावरी महाआरती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर हिमगौरी आडके-आहेर, शांताराम शास्त्री भानोसे, ‘फिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, जयंत गायधनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक, भाविक तसेच समाजातील विविध घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कुंभमेळ्याच्या माध्यमातून लहान मोठ्या उद्योगांना चालना मिळणार-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

माजी राष्ट्रपती श्री. कोविंद यांनी नाशिकच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रभू श्रीराम, पंचवटी आणि गोदावरी नदीमुळे नाशिकची ओळख देशभरात पवित्र आणि प्रेरणादायी भूमी म्हणून निर्माण झाली आहे. गोदावरी महाआरतीच्या माध्यमातून नदी स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जनजागृतीचा शाश्वत संदेश समाजापर्यंत पोहोचविला जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा

हा उपक्रम केवळ धार्मिक स्वरूपाचा नसून पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणारा आणि नदी संवर्धनासाठी प्रेरणा देणारा आहे. समाजातील सर्व स्तरांतील नागरिक एकत्र येऊन महाआरतीत सहभागी होत असल्याने या उपक्रमातून सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत चित्र दिसून येते. विविध भाषा, परंपरा आणि श्रद्धा असूनही भारतीय संस्कृती आपल्याला एका समान धाग्यात बांधून ठेवते, असे त्यांनी नमूद केले.

भारतीय संस्कृतीतील “वसुधैव कुटुंबकम्” या विचाराचा उल्लेख करत त्यांनी देशाच्या एकात्मतेची परंपरा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. राष्ट्रपती श्री. कोविंद यांनी देशात शांतता, समृद्धी, सौहार्द आणि बंधुभाव कायम राहावा, अशी भावना व्यक्त केली. तसेच गोदावरी सेवा समितीच्या प्रेरणादायी कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. फिक्कीचे अध्यक्ष श्री. कांबळे यांनी भारताच्या हजारो वर्षांच्या सभ्यतेचे सामर्थ्य हे सामाजिक ऐक्य, परस्पर आदर आणि सांस्कृतिक मूल्यांमध्ये असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोदावरी स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सपत्नीक गोदावरीची पुजा केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790