नाशिक। दि. २६ ऑगस्ट २०२६: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 मध्ये दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील एकूण 9 हजार 731 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 86 कोटी 51 लाख इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद, समितीचे सदस्य- सचिव तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नाशिक कुंदन भोळे यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 7 ऑगस्ट, 2026 रोजी जिल्ह्यातील एकूण २० हजार ३४१ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात १७३ कोटी ६९ लाख ९३ हजार २८७ रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली होती. यापैकी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 12 हजार 311 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 86 कोटी 72 लाख 65 हजार 528 रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली, तर व्यापारी बँकेच्या 8 हजार 30 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 86 कोटी 97 लाख 27 हजार 759 रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली.
या योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 24 ऑगस्ट, 2026 रोजी जिल्ह्यातील एकूण 9 हजार 731 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 86 कोटी 51 लाख इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यापैकी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 4 हजार 856 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 34 कोटी 92 लाख रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली, तर व्यापारी बँकेच्या 4 हजार 875 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 45 कोटी 57 लाख रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 30 हजार 72 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 260 कोटी 21 लाख इतकी रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील पहिल्या यादीतील 35 हजार 642 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 31 हजार 956 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले असून 3 हजार 886 लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे. ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर आधार क्रमांक, कर्जखाते, कर्ज रक्कम आदींबाबत तक्रार नोंदविलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांबाबत संबंधित बँकेकडून कागदपत्रे प्राप्त करून घेऊन online पद्धतीने तक्रार निवारणाचे कामकाज जिल्हास्तरीय समितीस्तरावर सुरू आहे.
ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी तत्काळ जवळच्या आपले सरकार केंद्राला किंवा ई सेवा केंद्राला भेट देऊन विनामूल्य आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी व ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करताना त्यांच्या आधार, कर्ज रक्कम व बँक कर्ज खाते क्रमांकाबाबत तक्रार नोंदवली आहे, त्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेच्या शाखेशी किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नाशिक कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन उपनिबंधक, सहकारी संस्था श्री. भोळे यांनी केले आहे.
![]()


