नाशिक: शेतकऱ्यांनी गुणवत्ता, किंमत व साठेबाजीबाबत तक्रारी नोंदवाव्यात- कृषी विभागाचे आवाहन

नाशिक। दि.१७ मे २०२६: राज्यातील खरीप हंगाम सुरळीत व यशस्वी होण्यासाठी बियाणे, खते व कीटकनाशके यांचा पुरवठा वेळेत, गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत शेतकरी, वितरक व विक्रेते यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालय पुणेचे कृषी संचालक (निवगुनि) सुनिल बोरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कमाल तापमानाचा पारा पुन्हा ३८ अंशांवर; उकाड्याची तीव्रता कायम

सदर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक ९८२२४४६६५५ उपलब्ध करून देण्यात आला असून, कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३४००० वरही संपर्क साधता येणार आहे. त्याचप्रमाणे controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवर तक्रारी व सूचना पाठविता येतील.

बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता, किंमत, साठेबाजी तसेच लिंकिंग संदर्भातील तक्रारी नोंदविताना संबंधितांनी नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व तक्रारीचा संक्षिप्त तपशील नमूद करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. आवश्यक असल्यास तक्रारीचे लेखी स्वरूप अथवा छायाचित्र व्हॉट्सॲपवर किंवा ई-मेलद्वारे पाठविण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष धोकादायक; नियमित रक्तदाब तपासणीची गरज

ज्या शेतकऱ्यांना व्हॉटस्ॲप वापरणे शक्य नाही, त्यांनी संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एक भ्रमणध्वनी, एक टोल फ्री क्रमांक व एक ई-मेल सेवा तक्रार निवारणासाठी सुरू करण्यात आली असून सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत तक्रारी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790