नाशिक। दि. १६ सप्टेंबर २०२६: ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ या उपक्रमांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्यावत (अपडेट) करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेचा शुभारंभ करताना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः आपल्या कार्डावरील बायोमेट्रिक माहिती अद्यावत केली.
नागरिकांनी आपल्या आधार कार्डावरील बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट, आयरीस व फोटो) तसेच इतर वैयक्तिक माहिती वेळेवर अद्यावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांची ओळख अधिक सुरक्षित राहावी आणि सरकारी योजनांचा लाभ विनाअडथळा मिळावा, या उद्देशाने दर पाच वर्षांनी नागरिकांनी आपली बायोमेट्रिक माहिती अद्यावत करावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
या सेवा पंधरवड्यादरम्यान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अधिकृत आधार नोंदणी केंद्रांवर नागरिकांना आपली माहिती अद्यावत करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांत आधार अपडेट केलेले नाही, त्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेत नजिकच्या आधार केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
आधार कार्ड अद्यावत ठेवल्याने सर्व प्रकारच्या शासकीय योजना, Direct Benefit Transfer (DBT) आणि डिजिटल सेवांचा लाभ सुलभतेने मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ या मोहिमेत उस्फूर्तपणे सहभागी होऊन आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आधार अपडेट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
![]()


