नाशिक। दि. ७ ऑगस्ट २०२६: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये लाभ घेतलेल्या व सध्या द्वितीय, तृतीय अथवा चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अर्जाचे ऑनलाईन नूतनीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्जाचे नुतनीकरण करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी नवीन HMAS पोर्टलवर जाऊन https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावरून अर्जाचे ऑनलाइन नूतनीकरण करावे. शासनाने अर्ज नूतनीकरणासाठी 15 सप्टेंबर,2026 ही अंतिम मुदत निश्चित केली असून सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या कालावधीत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज भरताना किंवा नूतनीकरण करताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक सामाजिक न्याय भवन, बी- विंग, नासर्डी पुलाजवळ, नाशिक- पुणे रोड, नाशिक येथे संपर्क साधावा.
अंतिम मुदतीनंतर अर्जामध्ये कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही. तसेच विहित मुदतीत अर्जाचे नूतनीकरण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक नसल्याचे गृहीत धरून त्यांचा अर्ज अपात्र करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत 15 सप्टेंबरनंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सहाय्यक आयुक्त श्री. नांदगावकर यांनी कळविले आहे.
![]()


