नाशिक। १९ जून २०२६: शहरावर संभाव्य पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या एल-निनोच्या प्रभावासह धरणांमधील मर्यादित पाणीसाठा लक्षात घेऊन महापालिकेने पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना लागू करण्यास सुरुवात केली आहे.
याच अनुषंगाने जून आणि जुलै महिन्यातील प्रत्येक शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे उद्या (दि. २०) शनिवारी शहरातील कोणत्याही भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी आजच आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धरणांतील उपलब्ध पाणीसाठा, आगामी पर्जन्यमानाचा अंदाज आणि शहरातील वाढती पाण्याची मागणी यांचा सखोल आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी जुलै अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास ऑगस्टपासून आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यानुसार शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची शक्यता असून त्यासाठी नागरिकांनी आतापासूनच पाणी वापराबाबत अधिक जबाबदारीने वागण्याची गरज निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून आवश्यक तेवढाच वापर करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
![]()


