नाशिक (प्रतिनिधी): आनंदवली खून प्रकरणात भूमाफिया टोळी उघडकीस आली असून या टोळीचा मास्टरमाइंड रम्मी राजपूत, सचिन त्र्यंबक मंडलिक याच्यासह बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब बारकू कोल्हे याच्यासह २० जणांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. राज्यात भूमाफियांविरोधात ही पहिलीच कारवाई ठरली आहे. त्यामुळे भूमाफियांमध्ये पोलिसांची जरब निर्माण झाली आहे.
पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल मंडलिक यांच्या फिर्यादीनुसार, वडील रमेश वाळू मंडलिक (७०) यांचा खून करण्यासाठी संशयित सचिन मंडलिक आणि त्याचे साथीदार अक्षय जयराम मंडलिक, भूषण भीमराज मोटकरी, सोमनाथ काशीनाथ मंडलिक, दत्तात्रय काशीनाथ मंडलिक, नितीन पोपट खैरे, आबासाहेब पाराजी भडांगे, भगवान बाळू चांगले, बाळासाहेब बारकू कोल्हे, गणेश भाऊसाहेब काळे, सागर शिवाजी ठाकरे, अनिल वराडे, जगदीश त्र्यंबक मंडलिक, रम्मी परमजितसिंग राजपूत, मुक्ता एकनाथ मोटकरी, यांनी कट रचून होमगार्ड गणेश काळे आणि आबासाहेब भडांगे यांचा भाचा भगवान चांगले यांना ३० लाख आणि १० गुंठे जमीन देण्याची सुपारी दिली.
या दोघांनी १७ फेब्रुवारी रोजी रमेश मंडलिक हे शेतात पाणी भरण्यास गेले असता दोघांनी धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. टोळीमध्ये गोकुळ काशीनाथ आव्हाड, अमोल हरिभाऊ कालेकर, सिद्धेश्वर रामदास अंडे, दत्तात्र्यय अरुण सुरवाडे, नारायण गोविंद बेंडकुळे यांचेही या भूमाफियांमध्ये कनेक्शन उघडकीस आले. या गुन्ह्याचा तपास सहायक आयुक्त समीर शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790