
नाशिक। दि. १६ सप्टेंबर २०२६: त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या कुटुंबाच्या इर्टिगा कारला मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. शहापूर तालुक्यातील आटगाव परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये श्रीराम जायसवाल, आयुष जायसवाल, लाडो जायसवाल आणि सुरज जायसवाल यांचा समावेश आहे. तर सुभी जायसवाल, शिवम जायसवाल, हाशिक जायसवाल, सुनीता जायसवाल, राधिका जैस्वाल आणि सतीश जैस्वाल हे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इर्टिगा कारमधील प्रवासी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन आटोपून मुंबईच्या दिशेने निघाले होते. आटगावजवळ आल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. धडक एवढी जोरदार होती की, कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले.
दरम्यान, अपघातग्रस्त इर्टिगा कार जोगेश्वरी येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.
![]()


