नाशिक। दि. ६ ऑगस्ट २०२६ : भारतीय हवामान विभागाने गुरुवारी (दि. ६) नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, या भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
बुधवारी (दि. ५) नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत दिवसभर अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने घटविण्यात येत आहे.
सध्या दारणा, कडवा, भावली, पालखेड, ओझरखेड, गंगापूर, वाघाड, वालदेवी, भाम, भोजापूर, आळंदी, करंजवण, कश्यपी आणि पुणेगाव या धरणांमधून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नांदूरमध्यमेश्वरचा विसर्गही कमी:
नांदूरमध्यमेश्वर धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्गही गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून कमी करण्यात आला. सकाळी २२,७७० क्यूसेक असलेला विसर्ग दुपारी ३ वाजेपर्यंत ११,०४२ क्यूसेक इतका करण्यात आला. रात्री साडेदहा वाजेपर्यंत याच प्रमाणात विसर्ग सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
![]()


