नाशिक। दि. ८ जुलै २०२६: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून, नाशिक-त्र्यंबकेश्वर या महत्त्वाच्या मार्गावर पिंपळगाव बहुल्याजवळ रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या प्रवाशांसह विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
बुधवारी सकाळी रस्ता खचल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद केली. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रस्ता बंद झाल्याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवरही झाला असून, त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवा तसेच नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बससेवाही तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. खाजगी वाहनांची वाहतूकही प्रभावित झाल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. हा मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
त्र्यंबकेश्वरात मुसळधार पाऊस; मुख्य रस्त्यांवरून पाण्याचा प्रवाह:
दरम्यान, मध्यरात्रीनंतर त्र्यंबकेश्वर शहरात पावसाने पुन्हा जोर धरल्याने अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पहाटे साडेतीनच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे भगवती चौक, बोहर पट्टी, मेन रोड, लक्ष्मीनारायण चौक आणि गंगाकाठ स्लॅब परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. मुख्य रस्त्यांवरून पाण्याचे प्रवाह वाहू लागल्याने नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
सखल भागांत सुमारे पाऊण तास पाणी साचून राहिल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला आणि पाण्याचा निचरा सुरू झाला. त्यानंतर परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली. मात्र, अनेक ठिकाणी चिखल साचल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()


