नाशिक: कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक

नाशिक। दि. १५ फेब्रुवारी २०२६: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या महिला भाविकांच्या संरक्षणासाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी नाशिक विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर (नाशिक ग्रामीण), पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण (नाशिक शहर), नियोजन विभागाचे सहसंचालक योगेंद्र चौधरी, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते, तर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे (धुळे), महेश्वर रेड्डी (जळगाव), श्रवण दत्त (नंदुरबार), अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे (अहिल्यानगर) हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट; दोन महिलांचे दागिने लंपास

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिला भाविकांची संख्या मोठी राहील. या पार्श्वभूमीवर महिलांच्या संरक्षणासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात. महिलांसाठी मदत केंद्रे, हिरकणी कक्ष, स्वच्छता गृहांची सुविधा असावी. तसेच दिव्यांगासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

महिला अत्याचाराच्या घटनांच्या प्रतिबंधासाठी तालुकास्तरावर भरोसा सेल कार्यरत असतात. ज्या तालुक्यांमध्ये भरोसा सेल नसेल तेथे जिल्हास्तरीय भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधावा. कौटुंबिक संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांसमवेत नियमितपणे बैठका घ्याव्यात. पती- पत्नीत समेट झाल्यानंतर या कुटुंबाच्या संपर्कात राहावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार गृहभेट करावी. अमली पदार्थ प्रतिबंधासाठी उपाययोजना कराव्यात. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची मदत घ्यावी. पोक्सो कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील पीडितेचे समुपदेशन करावे.

🔎 हे वाचलं का?:  अक्षयतृतीया निमित्त बालविवाह रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

रेल्वे प्रवासात महिलांशी निगडित काही अप्रिय घटना घडू नये. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे व पोलिस दलाने नियमितपणे संवाद साधावा. दक्षता समिती, नागरी हक्क संरक्षण समितीच्य बैठकांमध्ये महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी रिक्षा, शालेय बसची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नियमितपणे तपासणी करावी. तसेच महिला अत्याचाराच्या घटनांचा सखोल तपास करून दोष सिद्धीचे प्रमाण अधिक वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. कराळे यांनी सांगितले की, विभागातील पाचही जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिस दलाच्या माध्यमातून विविध उपाययोजन करण्यात येत आहेत. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी ड्रोनची मदत घेण्यात येत आहे. ठिकठिकाणी कारवाई करून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलिस अधीक्षक श्री. धिवरे, श्री. दत्त, श्री. रेड्डी, श्री. मिरखेलकर, श्री. कलबुर्गी, श्री. चव्हाण यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790