
नाशिक (प्रतिनिधी): शुभम पार्क भागातील चर्चसमोरील मुख्य वर्दळीचा रस्त्यालगत गुरुवारी (दि. १३) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने सुमित देवरे (२०, रा. महाजननगर) याच्यावर हल्ला चढवत चॉपरने सपासप वार करत त्याचा निर्घृण खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या ८ तासांत दोन युवक आणि दोन विधी संघर्षित बालकांना जेरबंद केले आहे.
ऐन होळी सणाच्या दिवशी रात्री घडलेल्या खुनाच्या या घटनेने सिडको परिसर पुन्हा हादरला होता. याप्रकरणी सुनिल सुभाष देवरे, (वय ४९ वर्ष, व्यवसाय: इलेक्ट्रीशियन, राहणार: रो.हा.नं.५, ए विंग, गंगेश्वर रेसीडंन्सी, एकदंत नगर, अंबड शिवार नाशिक) यांनी फिर्याद दिली की, गुरुवारी (दि. १३ मार्च २०२५) रोजी सायं. ७ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान त्यांचा मुलगा सुमित सुनिल देवरे, (वय: २०) याला त्याच्या मित्रांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फोनवर शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच शुभम पार्क चर्च समोर बोलावुन त्याचेवर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारले. त्याबाबत अंबड पोलीस ठाणे, नाशिक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक: २००/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३५२, ३५१(२), ३५१ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच नमुद आरोपी व विधी संघर्षित बाल यांनी पळुन जाण्यासाठी फिर्यादी नैतिक मुरलीधर ठाकुर, रा. शुभम पार्क चर्च जवळ, उत्तम नगर सिडको नाशिक यांना हत्याराचा धाक दाखवुन त्यांची मोटार सायकल बळजबरीने चोरी केली व पसार झाले. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर क्रमांक: २०१/२०२५ भा. न्या. संहितेचे कलम ३०९ (४),१२६(१),१२६(२),३५२,३५१(२), ३५१(३),३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत व गुन्हे शोध पथकाचा स्टाफ यांनी अहोरात्र मेहनत करून सदर गुन्हयात फरार असलेले ०२ संशयित आरोपी: अरूण उत्तम वैरागर, (वय २० वर्ष, रा. शिरसाठ यांच्या रूम मध्ये भाडेतत्वावर, लिवर फिटनेस निमच्या मागे, फडोळ मळा, अंबड, नाशिक), प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे, (वय १९ वर्ष, रा. स्वामी समर्थ केंद्राच्या मागील गल्लीत, माऊली लान्स जवळ, डि.जी.पी. नगर, अंबड, नाशिक) आणि दोन विधी संघर्षित बालकांना यांना राणे नगर, मुंबई आग्रा हायवे, नाशिक येथुन ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यापासून अवघ्या आठ तासांच्या आत संशयित आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.