नाशिक। दि. १० फेब्रुवारी २०२६: तंत्रज्ञानाच्या युगात महावितरणने पाऊल टाकत राज्यातील ३ कोटी १६ लाख ग्राहकांसाठी ‘स्मार्ट टीओडी’ (Time of Day) मीटर लावण्यात येत असून, अचूक बिलिंग, पारदर्शकता आणि थेट वीजदरात सवलत देणारी ही योजना सध्या राज्यात गतिमानतेने राबविली जात आहे.
या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांचा अनुभव पूर्णपणे बदलणार असून, स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेत ९ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत ‘स्मार्ट मीटर पंधरवडा’ सर्वत्र साजरा करण्यात येत आहे.
स्मार्ट टीओडी मीटरची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:
मानवी हस्तक्षेपाशिवाय मीटर रीडिंग थेट महावितरणच्या सर्व्हरवर पोहोचणार आहे. यामुळे चुकीचे रीडिंग, अंदाजे बिल किंवा घर बंद असल्याने बिल न मिळणे यांसारख्या तक्रारींना पूर्णविराम मिळेल. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार, सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ८० पैसे ते १ रुपयापर्यंत सवलत मिळणार आहे. ही सवलत १ जुलै २०२५ पासून लागू झाली असून घरगुती ग्राहकांसाठी हे मोठे आर्थिक बचत करणारे पाऊल आहे.
हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ग्राहकांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.
स्मार्ट मीटरबाबत असलेला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ते प्रीपेड आहेत. मात्र, हे मीटर पोस्टपेडच असून सध्याप्रमाणेच वीज वापरल्यानंतर महिनाअखेरीस बिल भरावे लागणार आहे.
‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’अंतर्गत सौर पॅनेल बसवणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर अत्यंत उपयुक्त आहेत. सौर ऊर्जेची निर्मिती, वापर आणि ग्रीडला दिलेली वीज याचा अचूक हिशेब (Net Metering) या स्मार्ट मीटरमुळे सुलभ होणार आहे.
गैरसमजांना बळी पडू नका :
काही स्तरांवर स्मार्ट मीटरमुळे वीजदर वाढतील असा चुकीचा प्रचार केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात स्मार्ट टीओडी तंत्रज्ञानामुळे घरगुती ग्राहकांचे वीजबिल कमी होण्यास मदत होणार आहे. पारदर्शकता वाढल्यामुळे ग्राहकांना केवळ वापरलेल्या विजेचे पैसे भरावे लागतील. “स्मार्ट मीटर म्हणजे अचूकता आणि बचतीचा संगम आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ग्राहकांनी हे मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे आणि महावितरणच्या आधुनिक सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाकडून करण्यात आले आहे.
![]()

