नाशिक। दि. २ मे २०२६: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे (महापारेषण) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी नाशिक येथे कुंभमेळा-२०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध वीज पारेषण प्रकल्पांची पाहणी करून कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
महापारेषणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयात आयोजित बैठकीनंतर डॉ. संजीव कुमार यांनी २२० के. व्ही विल्होळी उपकेंद्र (राजूरबहुला), ४०० के. व्ही. पिंपळगाव (सारोळे), २२० के. व्ही. म्हसरूळ आणि १३२ के. व्ही. पंचवटी (म्हेरी) येथील उपकेंद्र प्रकल्पांना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. या प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे.
सुमारे ६४३ कोटींच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना वेळेत पूर्ण करण्यासाठी डॉ. संजीव कुमार यांनी विशेष भर दिला. पावसाळ्यापूर्वी सर्व स्थापत्य कामे पूर्ण करावीत तसेच डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व प्रकल्प पूर्णत्वास न्यावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यानंतर झालेल्या आढावा बैठकीत कंत्राटदारांना आवश्यक प्रशासकीय मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच प्रत्येक १५ दिवसांनी प्रगतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वीजपुरवठा अधिक सक्षम व विश्वासार्ह करण्यासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
यावेळी संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) डी. व्ही. पडळकर, मुख्य अभियंता सुनील सूर्यवंशी, किशोर गरूड, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके, मुख्य अभियंता (स्थापत्य) संदीप हाके, अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे, सागर जारे उपस्थित होते.
![]()

