नाशिक: रानभाज्यांच्या संवर्धनासोबत बाजारपेठ विकासावर भर देण्याची गरज- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक। दि. २२ ऑगस्ट २०२६: रानभाज्यांच्या बियाण्यांची उपलब्धता वाढवून आगामी काळात त्यांची बँक निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यामुळे रानभाज्यांच्या बियाण्यांची उपलब्धता व संवर्धनाला मोठी चालना मिळू शकते. रानभाज्यांच्या संवर्धन, बियाणे उपलब्धता आणि बाजारपेठ विकासासंदर्भात शासनाची विविध धोरणे आहेत. या धोरणांची प्रभावी व व्यापक अंमलबजावणी करून त्याचा लाभ अधिकाधिक नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रानभाजी महोत्सवात केले.

आज कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती), माविम व रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या (रामेती) प्रांगणात करण्यात आले आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, मालेगावचे उप विभागीय कृषि अधिकारी संदीप मेढे यांच्यासह माविम, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तालुक्यातील बचत गटांचे सदस्य, शेतकरी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २ हजार ४२१ पदांसाठी भरती

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की रानभाज्यांमध्ये आरोग्यदायी आहाराच्या दृष्टीने मोठी क्षमता असून त्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास व संशोधन करून पारंपरिक पाककृतींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तसेच रानभाजी पाककृती व विक्रीच्या रानभाज्यांच्या पारंपरिक स्वरूपाचा आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीचा विचार करून पाककृती विकसित करणे आवश्यक आहे. रानभाज्यांच्या मूळ स्वरूपाचे जतन करत ग्राहकांच्या आवडीनुसार नवीन पाककृती विकसित करण्यासाठी अन्न संशोधकांनी प्रयत्न करावेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य विभाग सज्ज; २५४ कोटींचा आराखडा

रानभाज्यांचे संवर्धन करणाऱ्या शेतकरी व नागरिकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे, रानभाज्यांसाठी बाजारपेठ विकसित करणे. रानभाजी पाककृतींच्या स्पर्धा, विक्री व प्रदर्शनांच्या माध्यमातून नागरिकांना विविध रानभाज्यांची चव, पौष्टिकता आणि उपयोगाची माहिती मिळते. यामुळे रानभाज्यांना ग्राहकांची पसंती मिळून त्यांच्यासाठी शाश्वत बाजारपेठ निर्माण होण्यास मदत होईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. २२) वीजपुरवठा बंद राहणार

रानभाज्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीच्या दृष्टीने मोठी क्षमता असून, त्यांच्या संवर्धनासोबत संशोधन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ विकासाला चालना दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे रानभाज्यांच्या संवर्धनाची ही चळवळ व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. या रानभाजी महोत्सवात नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे, आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी विविध स्टॉलला भेट देत आरोग्यदायी रानभाज्यांची माहिती व महत्त्व जाणून घेतले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790