नवसंघर्ष संघटनेचा सरकारला ३० दिवसांचा अल्टिमेटम
नाशिक। दि. १४ ऑगस्ट २०२६: अॅप-आधारित कंपन्यांकडून सुरू असलेली कथित बेकायदेशीर बाइक टॅक्सी सेवा तातडीने बंद करण्याच्या मागणीसाठी नवसंघर्ष संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी मंत्रालयावर काढण्यात येणारा मोर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर तूर्त स्थगित करण्यात आला. मात्र, पुढील ३० दिवसांत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास राज्यभरातील रिक्षा संघटनांना सोबत घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
मुंबईतील वांद्रे परिवहन कार्यालयात नवसंघर्ष संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर आणि परिवहन उपायुक्त सचिन कुमार अनंत गिरी यांची भेट घेतली. यावेळी अॅप-आधारित कंपन्यांकडून सुरू असलेल्या दुचाकी प्रवासी वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी करणारे ११ पानी निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावर शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाधान अहिरे, संस्थापक कार्याध्यक्ष नितीन मुर्तडक, प्रदेशाध्यक्ष अमजद खोत, प्रदेश उपाध्यक्ष गणेश निळकंठ, राज्य संघटक मोसिन शेख, जिल्हाध्यक्ष नीलेश दुगड, जिल्हा सरचिटणीस अशफाक शेख, जिल्हा प्रवक्ते अवधूत खडके, शहराध्यक्ष मनोज शिरसाठ, शहर उपाध्यक्ष दत्तू शेंडगे, आसिफ पठाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
⚡ संघटनेच्या प्रमुख मागण्या:
👉 बाइक टॅक्सीवर तातडीने बंदी : अॅपवर उपलब्ध असलेला बाइक टॅक्सीचा पर्याय त्वरित हटवून ही सेवा बंद करण्यात यावी.
👉 अनधिकृत वाहतूक रोखावी : नाशिक शहरात आवश्यक परवाना अथवा वैध परवानगीशिवाय सुरू असलेली बाइक टॅक्सी सेवा तातडीने थांबवावी.
👉 भविष्यातही परवानगी देऊ नये : महाराष्ट्रात भविष्यात कोणत्याही बाइक टॅक्सी सेवेला मंजुरी देऊ नये.
👉 रिक्षा संघटनांशी चर्चा आवश्यक : बाइक टॅक्सीबाबत कोणतेही धोरण निश्चित करण्यापूर्वी परवानाधारक रिक्षाचालकांच्या संघटनांशी सविस्तर चर्चा करण्यात यावी.
👉 रिक्षाचालकांच्या रोजगाराचे संरक्षण : कायदेशीर रिक्षाचालकांचा रोजगार आणि त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरक्षित राहण्यासाठी शासनाने ठोस धोरण आखावे.
दरम्यान, शासनाने या मागण्यांवर सकारात्मक आणि ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नवसंघर्ष संघटनेने दिला आहे.
![]()


