नवी दिल्ली, दि. ५ जून: देशभरातील शेतकरी आणि नागरिकांना प्रतीक्षेत ठेवणारा नैर्ऋत्य मोसमी पाऊस अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गुरुवारी केली. दरवर्षी साधारणतः १ जूनच्या सुमारास केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन होते. मात्र, यंदा त्याच्या आगमनास तीन दिवसांचा विलंब झाला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मोसमी पाऊस अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य व आग्नेय भागांसह पश्चिम-मध्य आणि पूर्व-मध्य समुद्राच्या काही क्षेत्रांमध्ये सक्रिय झाला आहे. तसेच संपूर्ण लक्षद्वीप, केरळ, माहे, कर्नाटक व तमिळनाडूच्या काही भागांपर्यंत त्याने प्रगती केली आहे. याशिवाय कोमोरिन क्षेत्र, आग्नेय बंगालचा उपसागर तसेच नैऋत्य, पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांमध्येही पावसाची आगेकूच सुरू असल्याचे विभागाने स्पष्ट केले.
दरम्यान, यंदाच्या हंगामात देशातील एकूण पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९० टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान दीर्घकालीन सरासरीच्या जवळ असले, तरी त्यामध्ये वाढ होत असून एल निनोच्या स्थितीकडे वाटचाल सुरू आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, जून महिन्यात एल निनोचा प्रभाव तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, सप्टेंबरपर्यंत त्याची तीव्रता मध्यम ते अधिक वाढू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
![]()

