मुंबई/नाशिक। दि. १७ एप्रिल २०२६: राज्यात पुढील काही दिवसांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी याबाबत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रात १८ एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलपर्यंत तर कोकणात १७ एप्रिलपर्यंत काही भागांत उष्ण व दमट हवामानाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. विविध विभागांत तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेपासून बचावासाठी पुरेसे पाणी आणि ओआरएसचे सेवन करावे, हलके व सैल कपडे परिधान करावेत, तसेच बाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे. शक्यतो सावलीत विश्रांती घ्यावी आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
तसेच दुपारी १२ ते ४ या कालावधीत उन्हात जाणे टाळावे. मद्यपान व कॅफिनयुक्त पेये टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लहान मुले किंवा प्राण्यांना उन्हात उभ्या असलेल्या वाहनांमध्ये ठेवू नये, अशीही सूचना करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन व औद्योगिक क्षेत्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणारे धोके कमी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात हलक्या पावसाची सर, उष्णतेचीही बसणार झळ:
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १८ ते २१ एप्रिलदरम्यान ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच १६ ते १८ एप्रिलदरम्यान राज्यात कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही. मात्र, १९ ते २२ एप्रिलदरम्यान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे.
![]()

