नवी दिल्ली, दि. १२ मे २०२६: देशातील टोल वसुली व्यवस्थेत मोठा बदल करत केंद्र सरकारने ‘मल्टी-लेन फ्री फ्लो’ या अत्याधुनिक टोल प्रणालीची सुरुवात केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी ‘अर्बन एक्सटेन्शन रोड-२’ मार्गावरील मुंडका-बक्करवाला टोल प्लाझा येथे या नव्या प्रणालीचे उद्घाटन केले.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात देशातील ९ राज्यांमधील १७ टोल नाक्यांचा समावेश करण्यात आला असून सप्टेंबर २०२६ पर्यंत ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक आणि आसाम या राज्यांमध्ये ही सुविधा सुरू होणार आहे.
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, दुसऱ्या टप्प्यात मार्च २०२७ पर्यंत आणखी १०८ हून अधिक टोल नाक्यांवर ‘मल्टी-लेन फ्री फ्लो’ प्रणाली लागू केली जाणार आहे.
ही प्रणाली ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन’ (ANPR) आणि ‘फास्टॅग’ तंत्रज्ञानावर आधारित असून वाहनांना टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही. वाहन जाताच टोल शुल्क स्वयंचलितपणे वसूल होणार असल्याने प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.
नव्या व्यवस्थेमुळे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून इंधनाची बचत आणि प्रवासाचा वेळही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
![]()

