मुंबई/नाशिक। दि. २६ जून २०२६: नाशिक महानगरपालिका हद्दीत शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळभाज्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शीतगृह उभारणीसाठी आवश्यक जागा महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य पंकज भुजबळ यांनी नाशिक परिसरातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या भाजीपाला साठवणुकीच्या समस्येबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.
नाशिक महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात उपलब्ध निधी आणि आवश्यक तरतुदींचा विचार करून सर्व संबंधित विषय सर्वसाधारण सभेपुढे मांडले जातील. त्यानुसार आवश्यक अद्ययावत उपाययोजना करण्यात येतील. तसेच नाशिक परिसरातील शेतकऱ्यांना साठवणुकीची सुविधा उपलब्ध झाल्यास भाजीपाला व कृषी उत्पादनांचे होणारे नुकसान कमी होऊन त्यांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली शीतगृह सुविधा तसेच भाजीपाल्याचा नाश होऊ नये यासाठी आवश्यक संपूर्ण प्रक्रिया उभी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासंदर्भात संबंधित सर्व घटकांची बैठक आयोजित करून आवश्यक निर्णय घेण्यात येतील.
![]()


