नाशिक। दि. १६ ऑगस्ट २०२६: नाशिक शहराच्या वाहतूक व्यवस्थेला सक्षम पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात ‘नाशिक रिंगरोड’ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला महत्त्वपूर्ण गती मिळत आहेत. मौजे आडगाव येथील गट क्रमांक 1678 व 1696 मधील आवश्यक जमीन रिंगरोड प्रकल्पासाठी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (MSIDC) राबविण्यात येत असलेल्या नाशिक रिंगरोड प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे संपादन जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने करण्यात येत आहे. मौजे आडगाव येथील संबंधित जमिनींचे आवश्यक मूल्यांकन, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून भसूंपादनाची कार्यवाहीस गती मिळाली आहे.या भूसंपादन प्रक्रियेमध्ये गट क्रमांक 1678 मधील सुधाकर वाळू देशमुख व संपत शंकर देशमुख, तसेच गट क्रमांक 1696 मधील अनिल शंकर देशमुख व अरुण वाळू देशमुख या चार खातेदारांच्या जमिनींचा समावेश आहे.
संबंधित खातेदारांच्या जमिनीच्या संपादनाबाबत आवश्यक मूल्यांकन, प्रशासकीय मंजुरी तसेच इतर अनुषंगिक कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, त्यानुसार भूसंपादनाची पुढील कार्यवाही करण्यात आली आहे. भूसंपादन अधिकारी, निफाड उपविभाग तसेच MSIDC यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
रिंगरोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल:
नाशिक रिंगरोड हा शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था, बाहेरील भागातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक तसेच विविध प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी या प्रकल्पाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले आहे.
![]()


