नाशिक। दि. २३ जुलै २०२६: गेल्या महिनाभरापासून प्रत्येक शनिवारी होत असलेल्या पाणीकपातीतून नाशिककरांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा तब्बल ८० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने येत्या शनिवार (दि. २५) पासून साप्ताहिक पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात नाशिक महापालिकेने जलसंपदा विभागाशी अधिकृत पत्रव्यवहार करून पाणीकपात थांबविण्याची मागणी केली आहे. राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेकडून याबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसाअभावी उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने जूनअखेरपासून दर शनिवारी पाणीकपात लागू केली होती. तसेच पावसाने साथ दिली नाही, तर ऑगस्टपासून दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचाही पर्याय विचाराधीन होता.
मात्र, जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे गंगापूर धरण समूहातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीकपातीची आवश्यकता कमी झाल्याचे प्रशासनाचे मत आहे.
दरम्यान, महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी सद्यस्थितीचा आढावा घेत पाणीकपात रद्द करण्याबाबत राज्य शासनाकडून आवश्यक मार्गदर्शन मागविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर नाशिककरांना शनिवारी होणाऱ्या पाणीकपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
![]()


