नाशिक। दि. २९ जून २०२६: आगरटाकळी मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रविवारी (दि. २८) रात्री भीषण अपघात घडला. भरधाव कंटेनरने मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने नवी मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. वंदना भास्कर निकुंभ यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे चुलत भाऊ श्रीकांत निकुंभ जखमी झाले आहेत.
हा अपघात रात्री सुमारे ९.३० वाजता आगरटाकळी येथील भाऊ बंगल्यासमोर घडला. डॉ. निकुंभ या चुलत भावासोबत दुचाकीवरून गांधीनगरहून ड्रीम सिटीकडे जात असताना, छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून नाशिक–पुणे महामार्गाकडे वळणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, डॉ. निकुंभ या कंटेनरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीकांत निकुंभ यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
डॉ. वंदना निकुंभ या तीन दिवसांच्या सुटीनिमित्त नाशिकला आल्या होत्या. सोमवारी मुंबईला परत जाण्यापूर्वीच या दुर्दैवी अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्याचे समोर आले आहे. नगरसेवक राहुल दिवे यांनी दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस नियुक्त करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केली होती.
तसेच आगरटाकळी मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करून ती छत्रपती संभाजीनगर महामार्ग–तपोवन मार्गे नाशिक–पुणे महामार्गावर वळविण्याची मागणीही त्यांनी पुन्हा केली आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
![]()


