नाशिक। १९ जून २०२६: आगामी कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या साधूग्रामाच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या वादग्रस्त प्रकरणावर आज (१९ जून) राष्ट्रीय हरित लवाद (NGT) अंतिम सुनावणी घेणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले असून, आजचा निर्णय शहरातील पर्यावरण संवर्धन आणि महापालिकेच्या नियोजनावर महत्त्वाचा परिणाम करू शकतो.
तपोवन परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी हरित लवादात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात आज प्रशासन आणि पर्यावरणवादी यांच्याकडून अंतिम युक्तिवाद मांडले जाणार असून, त्यानंतर लवादाकडून निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
लवादाच्या निर्णयाचे पालन करू : मनपा आयुक्त:
या संदर्भात नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी सांगितले की, “नाशिक शहरात हरित क्षेत्राचे प्रमाण जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवादासमोर आमची भूमिका स्पष्टपणे मांडली जाईल आणि जो निर्णय दिला जाईल, त्याचे पूर्णपणे पालन करण्यात येईल.”
स्थगितीनंतरही २२ वृक्षांची तोड; उत्तर प्रलंबित:
दरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. श्रीराम पिंगळे यांनी दावा केला की, हरित लवादाने स्थगिती आदेश दिल्यानंतरही २२ वृक्षांची तोड करण्यात आली. या बाबत महापालिकेकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण किंवा उत्तर दाखल करण्यात आलेले नाही. मात्र, तपोवन प्रकरणाची सुनावणी तातडीने घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
![]()


