नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

नाशिक। दि. ९ जून २०२६: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशभरातील आपली आगेकूच कायम ठेवत सोमवारी तेलंगणात प्रवेश केला. यामुळे तेलंगण हे यंदाच्या हंगामातील मान्सून पोहोचलेले १३ वे राज्य ठरले आहे. यापूर्वी मान्सूनने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी जिल्ह्यातील हरणाई किनारा ओलांडत मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आणखी काही भागांमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात मान्सूनचे आगमन पुढील ३ ते ५ दिवसांत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात मात्र मान्सून पोहोचण्यासाठी आणखी सुमारे दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एस.टी. बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग झोन'ची प्रभावी अंमलबजावणी

सोमवारी दुपारपर्यंत मान्सून मुंबईपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर होता. पुढील २४ ते ४८ तासांत तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आतापर्यंत मान्सूनची वाटचाल नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असली, तरी महाराष्ट्रातील पुढील प्रवास याच वेगाने होईल, याबाबत अनिश्चितता असल्याचे राज्याच्या कृषी विभागाने यापूर्वी नमूद केले होते.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'येलो अलर्ट' !

दरम्यान, राज्यभरात मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाला अपेक्षित वेग येण्यास काहीसा विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन जलस्रोतांचे नियोजन करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्रासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या बहुतांश भागांवर प्रभाव निर्माण केला असून, त्याचा परिणाम म्हणून ९ ते ११ जून या कालावधीत नाशिकसह राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790