मान्सून वेळेआधीच अंदमानात दाखल, केरळमध्ये 26 मे, तर महाराष्ट्रात कधी?

नवी दिल्ली। दि.१७ मे २०२६: नैऋत्य मान्सूनने यंदा वेळेआधीच प्रगती करत अंदमान समुद्र, निकोबार बेटे तसेच बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी यासंदर्भातील माहिती दिली. मान्सूनची ही वेगवान वाटचाल पाहता, तो केरळमध्ये २६ मेपर्यंत दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

सामान्यतः केरळमध्ये मान्सूनचे आगमन १ जूनच्या सुमारास होते. मात्र, यंदा तो सुमारे चार ते पाच दिवस आधीच दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतर त्याची पुढील वाटचाल देशाच्या इतर भागांकडे होते आणि त्यानंतर पावसाळी हंगामाची अधिकृत सुरुवात मानली जाते.

हवामान तज्ज्ञांच्या मते, अंदमान परिसरात निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग मिळाला आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्रात ढगांचे दाट आवरण तयार झाले असून, पुढील २४ तासांत मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पोषक असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

गेल्या वर्षी मान्सूनने अंदमानात १३ मे रोजी प्रवेश केला होता. यंदा तो १६ मेपर्यंत पोहोचला असून, त्यानंतरच्या गतीचा विचार करता महाराष्ट्रातही तो नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात २ ते ५ जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होऊ शकते. त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांसह शेतकऱ्यांचे लक्ष आता मान्सूनकडे लागले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

दरम्यान, एल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा किंचित कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) सुमारे ९२ टक्के पर्जन्यमान नोंदवले जाऊ शकते, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790