नाशिक। दि. २५ एप्रिल २०२६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी शाळाबाह्य किंवा खासगीरीत्या बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या
परीक्षेसाठी फॉर्म क्रमांक १७ भरण्याची प्रक्रिया २२ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. जे विद्यार्थी नियमित शाळेत न जाता परीक्षेला बसू इच्छितात, त्यांच्यासाठीही नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी २२ एप्रिलपासून ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
या प्रक्रियेसाठी २१ मे ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, काही विशेष कारणास्तव विलंब झाल्यास २९ मेपर्यंत अर्ज करण्याची मुभा असेल. पात्र असूनही यापूर्वी अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मंडळाने ही विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरून अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे व शुल्क विहित मुदतीत जमा करावे, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत व अचूक अर्ज भरावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
![]()

