नाशिक। दि. २४ एप्रिल २०२६: शहर आणि परिसरात उष्णतेची तीव्रता वाढत असून गुरुवारी (दि. २३) कमाल तापमानाने हंगामातील उच्चांक गाठला. तब्बल ३९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, दिवसभराच्या कडक उन्हामुळे उष्णतेच्या झळा अधिकच जाणवत आहेत. किमान तापमानातही वाढ होऊन ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
मागील दहा ते बारा दिवसांपासून कमाल तापमान सातत्याने ३९ अंशांच्या पुढे स्थिरावले आहे. गुरुवारी त्यात आणखी वाढ होऊन उष्णतेची तीव्रता अधिकच जाणवली. दिवसाच्या प्रखर उन्हासोबतच रात्रीच्या वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रात्रीही दिलासा मिळत नसल्याने अस्वस्थता वाढली आहे. हवामान खात्याकडून बुधवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला होता.
दरम्यान, गुरुवारी अवकाळी पावसाचा कोणताही ठोस इशारा नसतानाही सायंकाळी सुमारे सहा वाजल्यानंतर पुढील तीन तासांसाठी गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश भागात पावसाची नोंद झाली नाही. आठवडाभरापूर्वी सलग तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता; परंतु जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. विजांच्या कडकडाटाचा अनुभव काही भागांत आला असला तरी आता पुन्हा आकाश निरभ्र झाल्याने उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
![]()

