मुंबई। दि. २७ मार्च २०२६: देशात इंधनटंचाई निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन लागू होणार, अशा आशयाच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडत या सर्व दाव्यांना फेटाळून लावले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केंद्र सरकारनेही याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, खोटे व्हॉट्सॲप संदेश फॉरवर्ड करणेही गुन्हा ठरू शकतो, त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन करण्यात आले.
इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी १० रुपयांची कपात केली आहे. या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा भार तेल कंपन्यांवर पडणार असून ग्राहकांना वाढीव दराचा फटका बसणार नाही, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
तसेच, देशाच्या शेजारील काही भागात तणावपूर्ण परिस्थिती असली तरी भारतात घरगुती गॅस किंवा इंधनाचा तुटवडा भासत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी पेट्रोल-डिझेलसाठी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन करत देशात सध्या पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
![]()

