नाशिक। दि. ११ फेब्रुवारी २०२६: शहरासह परिसरात हवामानात बदलाचे संकेत स्पष्टपणे जाणवू लागले असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मागील काही दिवसांपासून तापमानाचा आलेख चढता राहिला असून मंगळवारी (दि. १०) कमाल तापमान ३२.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. याचबरोबर किमान तापमानातही वाढ नोंदविण्यात आली असून ते १४.४ अंश सेल्सिअस इतके राहिले.
दिवसागणिक वातावरणात उष्णता वाढत असून दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. रात्रीदेखील थंडीचा प्रभाव कमी होत चालल्याने सौम्य उकाडा जाणवू लागला आहे. तापमानातील वाढीमुळे नागरिकांना रात्री जाणवणारा गारठा हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवेत असलेली आर्द्रताही घटली असून सकाळच्या सुमारास ती सुमारे ७६ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. यापूर्वी ९० टक्क्यांहून अधिक असलेली आर्द्रता कमी झाल्याने वातावरण कोरडे होत असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी सुरू झाल्यापासूनच कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून २९ अंशांवर असलेला पारा आता ३३ अंशांच्या जवळपास पोहोचला आहे.
फेब्रुवारी महिनाभर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता असून दुपारच्या वेळी सरासरी तापमानात दोन ते चार अंशांची वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
![]()

