नववर्षाच्या स्वागताला कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात किमान तापमानात सातत्याने घट

मुंबई/नाशिक। दि. २७ डिसेंबर २०२५: उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम राहिल्याने महाराष्ट्रातील किमान तापमानात लक्षणीय घट होत आहे. परिणामी, यंदा नववर्षाची सुरुवात गारठ्याच्या वातावरणात होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी मुंबईत किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले, तर नाशिकमध्ये ९.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली. राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान १० ते १२ अंशांच्या दरम्यान राहिले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना अटक !

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, नव्या वर्षाच्या प्रारंभी थंडीचा कडाका अधिक जाणवेल. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक अग्रेय शेट्टी यांनी स्पष्ट केले की, हिमालयीन भागात अपेक्षेप्रमाणे बर्फवृष्टी झालेली नाही.

मात्र उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशाच्या खालच्या भागांत बर्फवृष्टी होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम म्हणून वर्षअखेरीस आणि नववर्षाच्या सुरुवातीस गारठा वाढण्याचा अंदाज आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790