
नाशिक | २५ नोव्हेंबर २०२५: तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोड प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मनपा आयुक्त व वृक्ष प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनिषा खत्री अनुपस्थित राहिल्याने उपस्थित पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आयुक्तांच्या अनुपस्थितीबद्दल जोरदार आक्षेप नोंदवत काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

त्यानंतर विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक आणि शेकडो पर्यावरणप्रेमी यांनी एकमताने १८३४ वृक्षांच्या तोडीस तीव्र विरोध केला. “एका झाडालाही हात लावू देणार नाही,” असा ठाम संदेश देत वृक्षतोड रोखण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मनपातर्फे वृक्षतोड प्रस्तावावर तीन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे मनपातर्फे जाहीर करण्यात आले.

पर्यावरणप्रेमींनी गरज पडल्यास न्यायालयातही याचिका दाखल करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. आगामी सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील संभाव्य वृक्षतोडीबाबतची ही महत्त्वाची सुनावणी पंचवटीतील पं. पलुस्कर सांस्कृतिक भवन येथे पार पडली.
उद्यान अधीक्षक विवेक भदाणे प्रास्ताविक करत असताना माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले आणि रोहन देशपांडे यांनी आयुक्त उपस्थित नसल्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. आयुक्तांशिवाय सुनावणी होऊ देणार नाही, असा त्यांचा आग्रह असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला; मात्र नंतर सुनावणी सुरू करण्यात आली.
या वेळी उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार आणि पोलीस निरीक्षक सुनील पवार उपस्थित होते.
तपोवन हा नाशिकचा ‘हिरवा श्वास’ असल्याचे सांगत तेथील प्रत्येक वेल, पक्षी, नैसर्गिक जलस्रोत आणि माती शहराच्या तापमान नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चार पर्यावरणप्रेमींनी केला. कोणत्याही परिस्थितीत वृक्षतोड मान्य करणार नाही, असा ठाम आणि आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
🗨️ कायद्याने तुम्हाला याबाबत कोणतेही अधिकार नाहीत:
महाराष्ट्र स्टेट ट्री अॅथॉरिटी अॅक्टच्या २०२१ मधील सुधारणेनुसार २०० पेक्षा अधिक झाडे तोडायची असतील आणि ती ५ वषर्षांपेक्षा जुनी असतील, तर स्थानिक वृक्ष प्राधिकरण किंवा प्रशासक निर्णय घेऊ शकत नाही. तसा प्रस्ताव राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवून मंजुरी बंधनकारक आहे. पालिकेला अधिकारच नाहीत. – देवांग जानी
🗨️ तुम्ही फक्त म्हणणे मांडा, आम्ही बघतो, आयुक्तांना सांगतो:
बांधकाम विभागाने उद्यान विभागाकडे १८२५ वृक्ष तोडण्यासाठी अर्ज केला आहे. त्यात सर्वेक्षणानंतर २५० वृक्ष तोडण्याची गरज, ५०० झाडे वाचविण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक पर्यावरणप्रेमी, नागरिकांनी आता फक्त म्हणणे मांडावे, हवे तर लेखी द्यावे ते आयुक्तांकडे दोन ते तीन दिवसांत सादर करू. – विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, मनपा
🗨️ यांना अधिकारच नाही:
तुम्हाला अधिकार आहे का आयुक्त उपस्थित नसताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना वृक्षतोडीबाबत अशाप्रकारे जनसुनावणी घेण्याचा अधिकारच नाही. ही फसवणूक म्हणजे एकप्रकारे नाशिककरांची फसवणूक आहे. – राजेंद्र बागूल
🗨️ सुनावणीपूर्वी डॉकेट करा:
सुनावणीपूर्वी साधूग्राम कसे करणार, तपोवनातील वृक्षाचे सर्वेक्षण कोणत्या पद्धतीने करण्यात आले, पर्यायी जागेत कुठे वृक्ष लावणार आहे याबाबत सर्व डॉकेट सुनावणीपूर्वी नागरिकांसाठी खुले करण्यात यावे. – रोहन देशपांडे
![]()
