मुंबई। दि. १२ सप्टेंबर २०२५: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस होईल अशा अंदाज वर्तवलाय. तर कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल.
नेहमी मुंबई आणि कोकणात धो-धो बरसणाऱ्या पावसाने आता या भागात काहीशी विश्रांती घेतलीय. येथील वातावरण ढगाळ राहणार असून येथील तापमान वाढणार आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. दुसरीकडे कोकणातील जिल्ह्यांमध्येही ढगाळ आकाश असेल, पण काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मात्र जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. यात पुणे, सातारा, सांगली,सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सोलापूरमधील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगरलाही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामधील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे.
दुसरीकडे मरावाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. तर धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. जालना आणि छत्रपती संभाजी नगरमधील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज आहे.
तर संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 12 सप्टेंबर रोजी वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
![]()

