नाशिक। दि. १९ जून २०२५: गोरगरिबांना वाटण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात दाखल झालेल्या ८३ क्विंटल धान्याचा अपहार करणाऱ्या दोघा दुकानदारांवर ग्राहकांसह शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरवठा खात्याने दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना देण्यात आलेला परवानाही निलंबित करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतील चौक मंडई परिसरातील स्वस्त धान्य दुकान क्र. ६९ मध्ये वेळेवर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर तालुका पुरवठा विभागाने केलेल्या पडताळणीत ८३ क्विंटल धान्याचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी
भद्रकाली पोलिस ठाण्यात दोन्ही दुकानांच्या विक्रेता आणि रेशन दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होत्या. तक्रारींच्या अनुषंगाने नाशिक तालुका पुरवठा विभागाने रविवारी (दि. १५) दुकानात पडताळणी केली. पडताळणीत शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या सुमारे ८३ क्विंटल धान्याचा हिशेब लागत नसल्याचे पुरवठा निदर्शनास आले. यात ३३ क्विंटल ४९ किलो गहू व ४९ क्विंटल ९१ किलो तांदूळ गायब असल्याचे समोर आले. विक्रेत्याकडे विचारणा केल्यावर उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित न करता ८३ क्विंटल धान्याचा अपहार करून शिधापत्रिकाधारक व शासनाची फसवणूक केली म्हणून विलास कनोजे यांनी संस्थाचालक अमोल दिगंबर सदावर्ते (रा. रंगुबाई जुन्नरे शाळेजवळ, द्वारका नाशिक) आणि मुकुंद सुभाष पाटकर (रा. शिवाजी नगर फेम सिनेमा समोर, गांधी नगर, नाशिक) यांच्याविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
धान्याचे वाटप होत नसल्याने शिधापत्रिकाधारकांचे रेशन दुकानदाराशी अनेकवेळा वाद झाले. यासंदर्भात पुरवठा विभागाचे अधिकारी विलास कनोजे आणि फिर्यादी (रा. मखमलाबाद) यांच्याकडे अनेक शिधापत्रिकाधारकांनी पुरवठा विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २२९/२०२५)