नाशिक | दि. ५ जून २०२५: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उकाड्याचा जोर वाढला आहे. मात्र, आता पुन्हा एकदा वातावरणात बदल होत असून, राज्यात काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, काही ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील कोकण किनारपट्टी भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळू शकतात. दरम्यान, अरबी समुद्रातील खवळलेले हवामान लक्षात घेता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ४५ ते ५५ किमी प्रतितास राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा:
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात मान्सूनची वाटचाल सध्या संथ असली तरी वातावरण पावसाला पोषक बनत आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790