नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
पंचवटीतील १७ वर्षीय तरुणाचा गोदावरीत बुडून मृत्यू; नदीत पोहणे बेतले जीवावर
नाशिक (प्रतिनिधी): मित्रांसोबत गोदावरी नदीतील गांधी तलाव येथे फोण्यासाठी गेलेल्या पंचवटीतील एका १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घोडदळी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहर्ष राजेंद्र भालेराव (वय: १७, राहणार: दातीर मळा, सिद्धेश्वर नगर, अंबड) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
सहर्ष भालेराव हा शुक्रवारी त्याच्या चार ते पाच मित्रांसोबत पंचवटीत रामकुंड येथे आला होता. दुपारी भालेराव व त्याचे मित्र गोदावरी नदीवरील गांधी तलावात पोहोण्यासाठी उतरले.
मात्र, नदीला वाहते पाणी सोडलेले असल्याने भालेराव व त्याच्यासह अन्य एकाला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघे जण पाण्यात गटांगळ्या खाऊन बुडाले.
मात्र त्यांच्यातील एकाला पाण्याबाहेर सुखरूप काढण्यात यश आलं. तर भालेराव पाण्याबाहेर न आल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा पाण्यात शोध घेतला. मात्र तो आढळून न आल्याने, जीवरक्षक दलाचे जवान शिवा बोरसे, सागर पाटील, संजोग सोळंके, रोहित वाघमारे, शिवा वाघमारे आदींनी तलावात उड्या मारून भालेराव याला पाण्याबाहेर काढले.
त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखलही केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. सहर्ष भालेराव हा केटीएचएम महाविद्यालयात बारावी विज्ञान विभागात शिक्षण घेत होता. नुकतीच त्याने बारावीची परीक्षा दिली होती. पुढे वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचे त्याचे स्वप्न होते.. मात्र या दुर्दैवी घटनेने त्याचे स्वप्न अपुरे राहिले… याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.