लोकनेते गोपीनाथराव मुंडे अठरा पगड जातींना न्याय देणारे व्यक्तिमत्व- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण  मुख्यमंत्री  यांच्या उपस्थितीत संपन्न

नाशिक (प्रतिनिधी): लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी अठरापगड जातीसाठी काम केले. गोपीनाथ मुंडे हे आपल्या कामामुळे लोकनेते या बिरूदाचे मुकुटमणी होते, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले

नांदूरशिंगोटे, ता. सिन्नर, येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. पालकमंत्री दादाजी भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रितम मुंडे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री छगनराव भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजाताई मुंडे,  आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, मोनिका राजळे, सुहास कांदे, हिरामण खोसकर,  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जि.प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे, माजी आमदार प्रकाश वाजे, उदय सांगळे, हेमंत धात्रक आदि मान्यवर उपस्थित होते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासन भरपाई देणार:
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हे सरकार शेतक-यांचे, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे असल्याने शेतक-यांनी घाबरून जाऊ नये, असे आश्वासन देत अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देणार, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.

राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेवून योजना आखल्या आहेत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत भरघोस तरतुद केली आहेत. उसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतीगृह उभारण्यात येतील. उसतोड कामगार महामंडळास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन देऊन स्व.गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन केले.

स्व. मुंडे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ: नितीन गडकरी
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर होते. समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी ते योद्धे होते. दलित, पिडीत, शोषित, गरीब समाजाला न्याय देण्यासाठी आपले आयुष्यपणास लावले. कृष्णाखोरे, तापी पाटबंधारे विदर्भ सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. मानवतेच्या, एकतेच्या, समतेच्या आधारावर सर्व समाजाचा विकास होण्यासाठी गोपीनाथरा मुंडे प्रयत्नशील होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना शेतक-यांच्या मुलांसाठी विविध योजना राबवाव्या लागतील. शेतकरी अन्नदाताबरोबरच उर्जा दाता बनला पाहिजेत. स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

अहमदनगर जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती करणार-राधाकृष्ण विखे पाटील:
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आजच्या स्मारकामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला असून असा नेता पुन्हा होणार नाही.  स्व.गोपीनाथ मुंडेच्या स्मरणार्थ अहमदनगर जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती करणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

सर्व समाजाला न्याय हीच गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली:
माजी मंत्री तथा आमदार छगनराव भुजबळ म्हणाले की, लोकांसाठी काम केलेल्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी हजारो लोक स्वयंस्फूर्तीने येत असतात. बहुजनांना एकत्र आणण्याचे काम गोपीनाथराव मुंडे यांनी केले असून, ओबीसींची गणना झाली पाहिजे, मंडल आयोगाची अमलबजावणी झाली पाहिजेत यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले. सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेणे, हीच स्व. गोपीनाथराव मुंडे यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे त्यांनी सांगितले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, भगवान बाबांची भक्ती, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आचरणात आणणारे, गोरगरीब जनतेसाठी झटणारे गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक उभे राहत आहेत याचा अभिमान आहे. स्व. मुंडे आणि श्री. गडकरी यांची काम करण्याची पध्दत एकसारखी होती. या दोघे ज्येष्ठ नेत्यांचा विकासाचा वारसा पुढे चालवू असे आश्वासित करून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ उसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृह, औरंगाबाद येथे दवाखाना उभारा, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

राजकारण व काम एकत्र न आणता काम करणारे स्व. गोपीनाथराव मुंडे सर्व पक्षात लोकप्रियतेत आघाडीवर असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय सांगळे यांनी तर उपस्थितांचे आभार माजी आमदार प्रकाश वाजे यांनी मानले.  कार्यक्रमास राज्यभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790